मराठी चित्रपटांचा 'श्वास'
मागच्या रविवारी पालेकरांचा 'बनगरवाडी' पाहिला. माडगुळकरांच्या पुस्तकातील कथेला किती न्याय दिला आहे हा मुद्दा माझ्या दॄष्टीने महत्वाचा नाही. कोणतेही सरळ आणि प्रामणिक भावनेने केलेले प्रयत्न सर्वांनाच भावतात असे मला तरी वाटते. असो, चित्रपट पाहाताना शाळेत वाचायला मिळालेल्या या पहिल्या पुस्तकाची आठवण झाली. शेवटच्या बाकावर बसण्याचा परिणाम कि काय पण हे सर्व मुलांच्या दॄष्टीने त्याज्य पुस्तक माझ्या नशिबी आले. काहिच पर्याय नव्ह्ता म्हणुन घरी नेले आणि अगदीच वेळ जात नव्हता म्हूणुन वाचायला ही घेतले. व्यंकटेश माडगुळ्करांची हि माझी पहिली ओळख. पहिल्याच पुस्तकात त्यांच्या शैलीने वेड लावले. शाळेतल्या मुलांनाही गुंगवून ठेवतील अशी त्यांची कथा सांगण्याची हातोटी. अर्थात हे काही कोणाला नवल नाही. पण चित्ररुपाने हि कथा पाहाताना पुस्तका एवढी मजा आली नाही. नेहमी प्रमाणे मात्र मी त्याची कारणमीमांसा करत बसलो नाही. एकतर पुस्तक वाचुन वर्ष उलटली होती, त्यामुळे काय ठेवलय काय गाळलय याचा अंदाज येणे कठिणच होते. आणि माझ्या आवडत्या पुस्तकावर आधारित असल्याने थोडा 'बायस' होणे स्वाभाविक होते. पण मराठी भाषेमधे चांगले चित्रपट काढण्याचे प्रयत्न होत आहेत पाहुन मात्र बरे वाटले. अमेरिकेत असताना 'श्वास' पाहिला होता. पिक्चर आवडला होता, पण कथेचा जीव इतका छोटा होता कि त्याचा परिणाम फार मोठा होणे कठिणच होते. नाही म्हणायला त्यामधील एक गोष्ट खटकली होती. डोळ्यांचे ओपरेशन होण्याच्या आधी त्याच्या आजोबांना त्या लहानग्या मुलाला अशा गोष्टी दाखवाव्याशा वाटतात कि ज्या त्याला कधी पाहायला मिळणार नाहीत. सर्कस, पिक्चर, बाग, शहर अशा सर्व गोष्टी ते त्याला दाखवतात. त्या मुलाचा जीव तेवढाच सुखावतो. पण मग त्याच्या आईला पाहुन घेण्याची इच्छा नसावी? एवढ्या सर्व गोष्टीत ही एक महत्वाची घटना रंगवायची दिग्दर्शक राहुन गेला, असे राहुन राहुन वाटते. तरी चित्रपटाची एवढी मजल पाहुन कोणत्याही मराठी माणसाला अभिमान वाटेल हे मात्र नक्की खरे.
पुण्यात असताना 'अनाहत' पाहाण्याचा योग आमच्या मित्रमंडळी मुळे आला नाही, पण ती हि हौस अमेरिकेत असताना पुर्ण करुन घेतली. सोनाली बेंद्रे सोडली तर त्या पिक्चर मधे खास असे काहिच वाटले नाही. अर्थात मी टेक्निकल अंगांचा विचार करत नाहिये. त्यामुळे पालेकर (आणि इतर चांगल निर्माते, दिग्दर्शक ) एवढ्या छोट्या जीव असलेल्या कथांवर चित्रपट का बनवतात हि 'पहेली' मला पडली. एक(च) अपवाद म्हणजे 'देवराई'. हिंदी पिक्चर मधे अतुल आणि सोनाली कुलकर्णी या दोघांनीही फार साधारण भुमिका करुन माझी निराशा केली होती. पण ह्या एक पिक्चरने सर्व भरपाई केली. सर्वच अंगानी ह चित्रपट सुरेख आहे. हिंदीतल्या 'पॅरलेल' सिनेमांसारखी मराठीत लाट आली आहे कि काय असे वाटु लागले आहे. चोखंदळ रसिकांसाठी हि नक्कीच चांगली बातमी आहे.
तरिही महेश कोठारेचा 'खबरदार' पाहयची दुर्बुद्धी मला झालीच, तुम्हाला होवु नये हि प्रार्थना :-)
0 Comments:
Post a Comment
<< Home